माजी खासदार छत्रपती संभाजीराजे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला, अशी घणाघाती टीका संभाजी राजे यांनी केली. राजे म्हणाले की, मी अपक्ष राज्यसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलं. राजवाडा सोडून प्रामाणिकपणाने 15 ते 20 वर्ष राज्य पिंजून काढलं लोकांसाठी काम केलं. लोकांचे-समाजाचे प्रश्न समजून घेतले. ते सोडवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे मी पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराजांचं फोटो किंवा स्मारक असेल त्यासमोर त्यांनी येऊन त्यांनी खरं काय ते सांगावं… मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे दोन आमदार पाठवले. त्यांनी म्हटलं की, मी शिवसेनेत प्रवेश करावे. आम्ही तुम्हाला दुसऱ्याच दिवशी उमेदवारी देऊ.. नंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी मला वर्षावर येण्याचं निमंत्रण दिलं. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो.
ते म्हटले की, आम्हाला छत्रपती आमच्या सोबत हवे. तुम्ही शिवसेनेत प्रवेश घ्यावा. मी प्रस्ताव ठेवला की, शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार मला करा. परंतू मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. परंतू शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार करण्याची आमची तयारी असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले. खरे तर तेही मला मान्य नव्हते. परंतू मी विचार करायला वेळ मागितली.
त्यानंतर त्यांच्याच एका नेत्याचा फोन आला की, राजे तुम्हालाच आम्हाला उमेदवारी द्यायची आहे. यासंबधी झालेल्या चर्चांचा ड्राफ्ट माझ्याकडे आहे. शिवसेना नेत्यांनी ड्राफ्टमध्ये एक वेगळाच शब्द टाकला होता. तो मी सांगणार नाही. परंतू तो मी बदलायला लावला. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी तो ड्राफ्ट फायनल झाला असे सांगितले. त्यांनी फायनल शब्द दिल्यानंतर मीही कोल्हापूरला गेलो.
कोल्हापूरला जाताना नवीन बातम्या मी पाहिल्या, संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारलं तर, त्यांनी उत्तरं दिली नाही. थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला. तर त्यांनी माझा फोन उचलला नाही. मला मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी दिलेला शब्द मोडला असा आरोपच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर लगावला होता.