सातारा ; सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर आता विरोधकांनी जोरदार टीका राज्य सरकारवर केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह येऊन मराठा आरक्षण मिळवूनच देणार असा विश्वास बोलून दाखविला होता. त्यातच आता यावर छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य करत थेट इशारा दिला आहे.
लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. उदयनराजे यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यसाठी आलेले असताना त्यांनी हे विधान केले आहे.
पुढे ते म्हणाले की, हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये, त्यापेक्षा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका, असा आदेश मराठा समाजाला दिला आहे.