सातारा | राज्यात आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राजकारण तापले आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडीकडून चौकशी केली जात आहे. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. त्यातच आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईडीला आव्हान दिलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“ईडीने यावं पण कारवाई करणार असाल तरच या अन्यथा येऊ नका. नाहीतर परत यांचा, त्यांचा फोन आला म्हणून सांगतील. तसं असेल तर येऊ नका, येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. नाहीतर उद्या उगाच राजकारण झालं, द्वेषापोटी अशी आरडाओरड होऊ नये,” असं आव्हानच उदयनराजेंनी दिलं आहे. यावेळी त्यांनी ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असं म्हटलं आहे.
यापूर्वी सुद्धा खासदार उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला होता. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली होती. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो असंही ते यावेळी म्हणाले होते.