नवी दिल्ली : राज्यात सचिन वाझे, मनसुख हिरेन, शुक्ला अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षाने आघाडी सरकारला घेरण्याची काम केले आहे. या धक्क्यातून सावरत आता सर्व नेते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महाविकासघाडीच्या गोटात जोरदार हालचारी सुरु झाल्या आहेत.
या सर्व घडामोडीवर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र ही भेट राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर होती की आणखी काही दुसऱ्या मुद्द्यावर हे अद्याप समोर आलेले नाही.
Thank you so much Hon. Mrs. Sonia Gandhi Ji for your valuable guidance. It’s always such pleasure interacting with you.
— Supriya Sule (@supriya_sule) March 25, 2021
वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय बंगल्यावर आघाडीमध्ये सामील असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे मंत्री आणि नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब हे नेते उपस्थित होते.
तसेच या बैठकीत रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांसंदर्भात केलेल्या आरोपांचा प्रतिवाद करण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याचे समजते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही, अशी खंत बोलून दाखविली.