शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थानांवर ईडीने छापा टाकला होता. त्यातच आता पुन्हा एकदा वाशिम येथील शिवसेनच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने छापे टाकले. त्यानंतर काही सवाल ‘ईडी’नंही उपस्थित केले आहेत.
आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही याप्रकरणात भावना गवळींच्या ट्रस्ट संदर्भात काही गंभीर आरोप केले आहेत. भावना गवळी यांनी ७० कोटींची ट्रस्ट गैरपद्धतीनं त्यांच्या ‘पीए’च्या नावावर केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता सोमया यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“भावना गवळी यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, ट्रस्टचं परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केलं आहे. ते करताना त्यांनी जी कागदपत्रं वापरली त्यात गैरप्रकार करण्यात आल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. खोट्या पद्धतीनं ट्रस्टचं रुपांतर कंपनीत करण्यात आलं आहे. त्यामुळे या गैरप्रकाराचा तपास व्हायला हवा अशी आमची मागणी आहे”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
यासोबतच या ट्रस्टमध्ये ७० कोटींची संपत्ती जी ट्रस्टची होती ती भावना गवळींनी त्यांच्या पीएच्या नावावर केली आहे, असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी यावेळी केला आहे.