राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले भारतीय जनता पक्ष सरकार अडचनीत आणण्यासाठी विविध मुद्द्याचा वापर करताना दिसून येत आहे. यातच आता महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे, हे सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा महाविकास आघाडीचे सरकार पाडून तिथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
खरगे म्हणाले की, मोदी-शहा या जोडगोळीने कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर व काँग्रेस आघाडीचे सरकार पेगॅससद्वारे हेरगिरी करून पाडले. त्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार या दोघांनी उलथवून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. आता या दोघांची नजर महाराष्ट्रावर आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नेत्यांवर पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे का, याची मला कल्पना नाही. मोदी व शहा पेगॅससची मदत आता घेतात का, हेही मला माहीत नाही. मात्र कर्नाटक, मध्य प्रदेशात जे घडले, तो महाराष्ट्रासाठी इशारा आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप नेते व घटनात्मक पदांवर विराजमान असलेल्या लोकांच्या सध्याच्या हालचाली पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्यांचे इरादे चांगले नाहीत असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.