नवी दिल्ली | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हता, तर काहींना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय होऊन अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. मात्र दुसरीकडे केंद्र सरकारने रूग्ण दगावले नसल्याचं म्हटलं होतं. संसदेच्या अधिवेशनात विचारण्यात आलेल्या एका लेखी उत्तरात केंद्राने ही माहिती दिली होती. या माहितीनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती,
कोरोना संसर्गाच्या काळात आंध्रप्रदेशात ऑक्सिजन अभावी काही रूग्णांचा मृत्यु झाला होता. काही रुग्ण व्हेंटीलेटर सपोर्टवर होते. त्यात ऑक्सिजनच्या अभावी मृत्यु झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. संसदेच्या कामकाजादरम्यान मंगळवारी ही माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. ९ ऑगस्टला आंध्रप्रदेश सरकारनं केंद्र सरकारला ही माहिती दिल्याचं देखील आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
आंध्रप्रदेशात काही रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यातील काही रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ऑक्सिजन टॅंक आणि बॅकअप सिस्टीममध्ये झालेल्या बिघाडामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आणि रूग्णांचा मृत्यु झाला, अशी माहिती केंद्राने दिली आहे. याआधी एका लेखी उत्तरात केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यु झाला नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर केंद्र सरकार संसदेत खोटी माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आला होता.