मुंबई | MIM चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे.त्यावरूनच त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. शनिवारी मुंबईत पार पडलेल्या तिरंगा रॅली सभेत ओवेसी यांनी महाराष्ट्रातील मागासलेल्या मुस्लिमांसाठी आरक्षण तसंच वक्फच्या संपत्तींना सुरक्षा देण्याची मागणी केली.
ओवेसी यांनी यावेळी मुस्लीम तरुणांना तुमची मुलं गरीब आणि अशिक्षित राहावी अशी इच्छा आहे का? विचारणा केली. ‘ज्या तरुणांचं वय १८ ते १९ आहे त्यांचं लवकरच लग्न होईल. त्यांना मुलं होतील. तुम्ही लग्न करणार ना? तुमच्या मुलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवायचे आहे का?,’ असे ओवेसी म्हणाले. अविवाहित तरुणांसंबंधी बोलताना ते म्हणाले की, ‘तुम्ही लग्न करणार ना? बॅचलर राहू नका. बॅचलर खूप त्रास देतात. माणूस घऱात थांबला की डोकं शांत असतं’.
ओवेसी यांनी यावेळी महाराष्ट्रातील मुस्लिमांना मतदान करण्याआधी शिक्षण आणि उत्पन्न अशा विषयांवर विचार करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, ”महाराष्ट्रात ४.९ टक्के मुस्लीम पदवीधर आहेत. २२ टक्के प्रायमरी, १३ टक्के सेकंडरी आणि ११ टक्के कॉलेजमध्ये आहेत. मुस्लिमांना शिकायचं आहे मात्र फी भरण्यासाठी पैसे नाहीत. दुसरीकडे आरएसएस मुस्लिमांमध्ये शिकण्याची इच्छा नाही असं खोटं सांगतं’.