धीरेंद्र शास्त्री गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर महाराज यांच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर महाराजांच्या लग्नाबाबतही चर्चा रंगू लागली आहे. याचदरम्यान आपण लवकरच लग्न करणार असल्याची माहिती बागेश्वर महाराज यांनी दिली आहे.मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात बागेश्वर महाराज यांचा दरबार झाला. प्रदीर्घ कालावधीनंतर धामवर पोहोचलेल्या बागेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बागेश्वर महाराज हजारोंच्या गर्दीतून बाहेर आले आणि मध्यरात्री त्यांना भेटले.
तसेच एका हिंदी वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. बागेश्वर धाममध्ये १२१ गरीब मुलींचे सामूहिक विवाह होत आहेत. सामूहिक विवाहाचे हे चौथे वर्ष आहे. बागेश्वर महाराज यांनी सांगितले की, या सामूहिक विवाहात नवीन जोडप्यांना कार आणि बाईक वगळता घरातील सर्व सामान दिले जाईल. म्हणजेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, कुलर, सोफा आणि डबल बेड सादर केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले.
बागेश्वर महाराजांना त्यांच्या लग्नाबाबत विचारले असता सध्या माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मी कोणी साधू-संत नाही, अगदी सामान्य माणूस आहे. आपल्या ऋषीमुनींच्या परंपरेतही अनेक महापुरुषांनी घराघरात जीवन व्यतीत केले आहे. देवही गृहस्थांमध्येच दिसतो. म्हणजे आधी ब्रह्मचारी, मग गृहस्थ, वनप्रस्थ आणि नंतर संन्यासाची परंपरा आहे, त्यावर आपण पुढे जाऊ. आम्हीही लवकरच लग्न करणार आहोत.