” माझा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आहे”

 

आज पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेही पवार म्हणाले. अजित पवार हे सध्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अतिवृष्टीनं शेतकरी व्याकूळ झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ही गंभीर स्थिती असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं पूरग्रस्त भागात तत्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणांची आवश्यकता आहे, ते त्यांना उपलब्ध करुन दिलं पाहिजे. या समस्यांवर तर कोणी बोलतच नसल्याचं अजित पवार म्हणाले.

मी राजकारण करण्यासाठी हा दौरा करत नाही. विरोधकांची भूमिका महत्वाची असते. या दौऱ्याच्या माध्यमातून दुसऱ्यांनी निवेदन देऊन त्यावर आपण बोलणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आपल्याला त्यातील बारकावे समजतात. ते प्रश्न सभागृहात चांगल्या पद्धतीनं मांडता येतात असेही अजित पवार म्हणाले. अडचणीतील माणसाला मदत होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

आज अतिवृष्टीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत करण्यात आली आहे. मात्र, मृत जनावरांना, पाळीव जनावरांना त्यांना मात्र, मदत दिली नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यांना देखील मदत मिळणं गरजेचं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आज मी याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: