मुंबई | राणा दाम्पत्यानं ‘मातोश्री’वर येत हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शेकडो शिवसैनिक काल रात्रीपासून मातोश्रीबाहेर जमले आहेत. काल संध्याकाळी उशीरा मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीबाहेरुन जात होती. त्यावेळी शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवार हल्ला केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील कलानगर जंक्शन येथे त्यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला.
शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मारण्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कलानगर जंक्शन येथे माझ्या गाडीवर जमावाने हल्ला केला पण ते कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातील कारभार पश्चिम बंगालपेक्षा वाईट आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या भ्रष्ट मंत्र्यांचा पर्दाफाश करणाऱ्या विरोधकांवर राज्य सरकाकडून हल्लाबोल केला जात आहे. अशा कृत्यांचा निषेध करतो, असे कंबोज म्हणाले.
उत्तर भारतीय संघात एक विवाह सोहळा होता, तिथून निघून मी घरी परतत होतो, कला नगर जंक्शनजवळ सिग्लला गाडी जेव्हा थांबली, त्यावेळी शंभर दोनशे शिवसैनिकांचा जमाव गाडी जवळ आला. त्यांनी सरळ माझ्या गाडीवर हल्ला केला. मला काही कळण्याच्या आत तिथे पोलीस आले, पण शिवसैनिकांनी माझ्या गाडीच्या काचा फोडल्या, हँडल तोडलं, गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
तसेच काही लोकांनी गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेत जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सिग्नव सुटला आणि माझ्या ड्रायव्हरने तिथून गाडी बाहेर काढली. मुंबईत अशा प्रकारची घटना रस्त्यावर होत असेल, तर मला वाटतं मुंबईची कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा मी निषेध करतो, असं कंबोज यांनी म्हटलं आहे.