मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनवण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
वाईंमुळे महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ होईल असे बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजप नेत्यांना डिवचले आहे. त्याला आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर टीका केली आहे. झिंगलेल्या अवस्थेत कोण आहे ते महाराष्ट्र पाहतोय. सामनात झिंगलेल्या मनस्थितीत लिहिलं जातं, अशी खोचक टीका दरेकर यांनी केली आहे.
दरेकर म्हणाले, ‘सामना’ हा भाजपवर टीका करण्यातच अर्धवेळ खर्च करतो. प्रज्ञा सिंह दारू हे औषध म्हणतात. त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐका, जर नाही ऐकायचे असेल तर नको ऐका. दुसऱ्या राज्यांचे बोलण्यापेक्षा आपल्या राज्याचे थोडे बघा. तुम्ही त्या राज्यात आंदोलन करा. तुमचा राष्ट्रीय पक्ष होऊ पाहतोय, असा चिमटाही त्यांनी काढला.