गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरुर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर ‘जलसंकट’ कोसळले आहे त्या महाराष्ट्राचाही विचार करावा. आधी चक्रीवादळ आणि पाठोपाठ अतिवृष्टी अशी संकटांची मालिकाच महाराष्ट्रात सुरू आहे. आता तरी केंद्र सरकार त्याचा विचार करणार आहे का?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केला आहे.
तसंच सामान्य माणसाला बाहेर काढण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीतच आहे, पण याची दखल केंद्र सरकारने त्वरित घेतली पाहिजे, एवढी ही आपत्ती मोठी आहे, राज्यातील नद्या-नाले, धरणे-बंधारे तुडुंब भरली असली तरी लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाची ओंजळ रिकामीच राहणार आहे. नुकसानीचे पंचनामे, तुमच्या त्या केंद्रीय पथकांचे पाहणी दौरे वगैरे होतच राहतील, आधी तातडीची मदत म्हणून केंद्राने भरीव अर्थसहाय्य महाराष्ट्राला द्यायला हवे. असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
मुळात संपूर्ण सप्टेंबर महिना महाराष्ट्र अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर अशाच संकटांखाली भरडला गेला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ महाराष्ट्रावर ‘निसर्ग’ किंवा ‘तौकते’ चक्रीवादळाप्रमाणे थेट धडकले नाही तर त्याने अतिवृष्टीचा जो तडाखा दिला आहे तो महाभयंकरच आहे. मुंबई, ठाणे, कोकणसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश अशा सर्वच भागांत या तडाख्याने होत्याचे नव्हते करून टाकले आहे.
मराठवाड्यात तर ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती आहे.धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. एरवी पाण्यासाठी आसुसलेल्या आणि दुष्काळी म्हटल्या जाणाऱ्या मराठवाड्याचे हे दुसरे रूप थरकाप उडविणारे आणि काळजी वाढविणारे आहे.
एकट्या मराठवाड्यात ३७ जणांचा मृत्यू झाला असून पाच हजारांवर जनावरे दगावली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात महापुराने सुमारे 450 पेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. शिवाय २० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. या आपत्तीतून बळीराजाला, सामान्य माणसाला बाहेर काढण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीतच आहे, पण याची दखल केंद्र सरकारने त्वरित घेतली पाहिजे, एवढी ही आपत्ती मोठी आहे असा सामना अग्रेलकेहत म्हंटल आहे.