राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर आता विरोधकांनी जोरदार टीका राज्य सरकारवर केली आहे, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीस यांनी यामध्ये राजकारण करू नये. महाराष्ट्र सरकारला अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालय सांगत आहे. आम्ही हा कायदा मंजूर करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाऊ. विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्यासोबत यावं, त्यांनी नेतृत्व करावं. असे विधान राऊत यांनी केले आहे. ते आज पत्रकार माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अजित पवार या सर्वांना मराठा आरक्षण हवं आहे. जो मार्ग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला होता त्याच मार्गावर हे सरकार चालल होतं, त्याच मार्गाने पुढील काम चालू आहे.’ असं म्हणत त्यांनी फडणविसांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले आहे. आता राऊत यांच्या या टिकेला विरोधक काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.