राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजत असताना विरोधकांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशन सुद्धा याच मुद्द्यावरून चांगलेच गाजले होते. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट केंद्र आणि राज्य सरकारला सवाल विचारला आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला आहे. ते आज पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा सवाल केला.
खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी माध्यमांसमोर केला होता.