“मंत्र्यांना दुष्काळ कसा असतो, हे दाखविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपलीय”

 

काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह इतर पक्षातील नेतेही करत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनीही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हे दृश्य पाहिल्यानंतरही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात ओला दुष्काळ दिसत नसेल तर , येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा ” दुष्काळ” कसा असतो हे दाखविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे, असा इशारा रविकांत वरपे यांनी दिला आहे.

सदर वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज ठाकरेंनी ही मागणी केली आहे.

Team Global News Marathi: