औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा हात सोडून एकनाथ शिंदेंच्या गातात सामील झाले. मात्र सुरुवातीपासून शिंदे गटात सामील होऊनही शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही. अशातच काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट केलं. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता.
तसेच टि्वट सोबतचं विधानसभेतलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील त्यांनी जोडलं होतं. मात्र काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली आहे.
अशातच ट्वीट डिलिट केल्यानंतर शिरसाट यांनी म्हटलं की, आम्ही आजही शिवसेना आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहोत. आम्ही उद्धव ठाकरे यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. आज जरी आमचे भांडण जरी झालं असलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही.
आम्ही दूर जरी झालो असलो तरी ते आमचे कुटुंबप्रमुख होतेच. त्यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती. आमची भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधात नव्हती. आमची भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होती. विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेलं नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर तटस्थ राहिलो ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहिले.
मंत्रिपदासाठी दबाव आणताय का असं विचारलं असता शिरसाट म्हणाले की, माझा स्वभाव तसा नाही. एखाद्यावर विश्वास ठेवला तर मान कापली गेली तरी हरकत नाही. मंत्रिपदासाठी मी भूकेलेला नाही. ज्या ठिकाणी चुकतं त्यावेळी बोलायला हवं. मला जे योग्य वाटतं ते मी स्पष्टपणे बोलतो. मंत्रिपद मिळालं किंवा नाही मिळालं हा विचार माझ्या डोक्यात कधीच येणार नाही, असंही शिरसाट म्हणाले.