मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण असावे, मुंबई आयुक्त चहल यांच्या या निर्णयाला विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील इतर नियोजन प्राधिकरणाऐवजी पालिकेकडून एकमेव नियोजन प्राधिकरणाचा सुरू असलेला घाट चुकीचा असून, त्यास मुंबई काँग्रेसने गुरुवारी स्पष्ट शब्दांत विरोध केला होता.
मुंबई पालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प हा शिलकी दाखवण्याच्या अनुषंगाने फुगवून दाखवला असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे. भाई जगताप यांच्या या टीकेमुळे पुन्हा एकदा काँग्रेसने मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेला डिवचले आहे.
मुंबईत म्हाडा, एमएमआरडीए, एमसीआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्टसारखी प्राधिकरणे अस्तित्वात आहेत. त्या यंत्रणा कार्यरत असताना एकच नियोजन प्राधिकरण म्हणजे विकेंद्रीकरणाचा उद्देश असफल ठरत असल्याचे भाई जगताप यांनी म्हंटले आहे.
मुंबईतील पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांसह, दवाखान्यांची स्थिती फार चांगली नाही. त्यांची दुरुस्ती आणि अत्याधुनिकरण आवश्यक आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात चर्चगेट, गिरगावसारख्या ठिकाणीही पाणी साचले. अशा ठिकाणी केवळ पंप बसवण्याचे काम केले जाणार आहे का? पालिकेने यासाठी चांगल्या योजना आखल्या पाहिजेत असे मत भाई जगताप यांनी मांडले आहे.