नवी दिल्ली | देशातील शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी देशात सध्या सुरू असलेल्या भोंगा प्रकरणावर पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे. छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या राकेश टिकेत यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने भोंग्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी भोंगे बंद झाले पाहिजेत असे स्पष्ट मत मांडले.
‘जास्त आवाज करतात असे भोंगे बंद झाले पाहिजेत. मग ते मंदिर असो किंवा मशिद. कुठेही लाउड स्पिकर नको. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरले ते चांगले झाले. लाउड स्पिकर बंद व्हावे ही भाजपची नाही तर जनतेची मागणी आहे. त्यामुळे ते झाले पाहिजे. पूजेचं स्थान शांतीचं आहे. शांती दोन्ही बाजूने झाली पाहिजे.’, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपली बाजू मांडली.
राकेश टिकेत हे रायपूर येते पोहोचले होते. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. 27 गावांचा भूमी अधिग्रहणाचे प्रकरण आहे. 20 ते 25 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांना जमिनीचा योग्य दर मिळावा, प्रश्न आहे. ‘मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोलणं झालेलं नाही. समितीशी आज बोलणार आहोत. मग शेतकऱ्यांची समिती त्यांच्याशी बोलेल. सरकारकडून काय कमी राहत आहे, शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत, यावर मार्ग काय काढता येईल यावर विचार एकत्र बसून केला जाईल,’ असेही ते म्हणाले. ‘या 27 गावांमध्ये एमएसपीचा प्रश्न नाही, जमीन अधिग्रहणचा प्रश्न आहे’, असे त्यांनी सांगितले.