पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये जोरदार निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्य लढत होत असताना दिसत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी थेट तृणमूलच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष करून टीका केली आहे. त्यात आता काँग्रेसने पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून आपले अंग काढून घेत ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे.
त्यात समोर आलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी रविवारी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतरच काँग्रेसने या पश्चिमबंगाल मधील प्रचार जवळजवळ थांबवल्याचे दिसत आहे. येथील मतदानाचे उर्वरित तीन टप्पे २२, २६ आणि २९ एप्रिल रोजी पार पडणार आहेत. या टप्प्यांतील मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या ४१ टक्के इतकी लक्षणीय आहे.
मात्र काँग्रेस पक्षासाठी हे टप्पे महत्त्वाचे आहेत कारण मालदा, मुर्शिदाबाद या परिसरात पक्ष अनेक जागांवर लढत आहे. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस-डावे पक्ष यांच्यात या मुस्लीम मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजपला मिळू नये, असे ममता बॅनर्जी यांना वाटत आहे. म्हणूनच त्यांनी भाजपचा पराभव आणि सेक्युलर विचारांच्या विजयासाठी काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती सोनिया गांधी यांना केल्याचे समजते.