कोल्हापूर |कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात २००९ साली झालेल्या पराभवानंतर स्थानिक राजकारणापासून दुरावलेले माजी आमदार मालोजीराजे पुन्हा राजकीय मैदानात उतरले आहेत. मालोजीराजे आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय विरोधकांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाले असून त्यासाठी त्यांनी पोटनिवडणुकीत प्रचाराचं मैदान चांगलंच गाजवलं आहे.
काल जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या विजयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह जे अनेक शिल्पकार आहेत, त्यामध्ये मालोजीराजेंचाही अग्रक्रम लागतो. यामुळे ते आता आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीचे भक्कम दावेदार बनले आहेत असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सन २००४ साली झालेल्या कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मालोजीराजेंनी शिवसेनेचे सुरेश साळोखे यांचा पराभव केला. ते काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. दोनवेळा सेनेचे आमदार झालेल्या साळोखेंची हॅट्रिक त्यांनी चुकवली. तालीम संस्थांना मदत आणि इतर अनेक कामांच्या बळावर त्यांनी पाच वर्ष शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिलं.
मात्र २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आमदार झाले. पराभवानंतर त्यांचा संपर्क कमी झाला. त्यामुळे २०१४ साली त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारली. २०१९ मध्येही त्यांच्या उमेदवारीची बरीच चर्चा झाली, परंतु तेव्हादेखील त्यांनी मैदानात उतरण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे चंद्रकांत जाधव यांच्या गळ्यात काँग्रेसची उमेदवारी पडली आणि ते सहजपणे निवडूनही आले.