महाराष्ट्र पेटला नाही, तुमची पेटलेली वात विझायला आली, शीतल म्हात्रे यांचा आघाडीचा टोला

 

महाविकास आघाडीतर्फे राज्यातील विविध मुद्द्यांवर निषेध करण्यासाठी महामोर्चा काढण्यात आला. यावेळी सभेत भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी “महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले असून, हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही.” असे म्हटले होते. त्यावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार पडणार हा संजय राऊतांना झालेला साक्षात्कार आहे.” असे त्या म्हणाल्या.

शीतल म्हात्रे म्हणाल्या की, “खासदार संजय राऊत हे आता ज्योतिषीपण झालेले आहेत. वेगवेगळ्या भूमिकेत ते शिरत असतात. त्यांना वेगवेगळे साक्षात्कार होत असतात. तसा फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार पडणार हा त्यांना झालेला साक्षात्कार आहे. दिवा विझतो तेव्हा त्याची शेवटची फडफड असते. तीच फडफड मोर्च्याच्या रूपात दिसून आली. मुंबई महापालिका आपल्या हातातून जाते की काय? अशी भीती वाटते. मुंबईमध्ये उद्ध्वस्त सेनेचा जीव आहे. मुंबई हातातून गेल्यास मुंबईतील उरलेसुरलेले लोकही राहणार नाहीत. याची त्यांना भीती आहे. म्हणून शक्तिप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न होता.” असे त्या म्हणाल्या.

अजित पवारांनी महाराष्ट्र पेटला, असे म्हटले होते. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाराष्ट्र पेटलेला नाही. तुमची पेटलेली वात विझायला आली आहे. हे महाराष्ट्र बघत आहे. निवडणुका आल्या की, महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. मुंबईचे तुकडे करायचे आहेत, असे सतत बोलत असता. वसुली सरकारला सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर काहीही कामे राहिली नाहीत. हा मोर्चा बेकारांना असलेले काम आहे. स्वतःच्या जीवावर मोठा मोर्चा करू शकत नाही.

हे उद्ध्वस्त सेनेच्या लक्षात आले. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अनेक पक्षांची कुबडं घेऊन हा मोर्चा त्यांनी पार पाडला.” असेही त्या म्हणाल्या. अंधारेताई या मोर्च्यात का नव्हत्या? त्या संताबद्दल, राम, कृष्णाबद्दल बोलतात. हिंदूंचे देव तुमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत? त्यांच्याबद्दल बोलले जात नाही. वि. दा. सावरकर हे महापुरुष नव्हते का? त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केले. मग, हा महापुरुषांचा अपमान नव्हे का? असा प्रश्नही शीतल म्हात्रे यांनी विचारला.

Team Global News Marathi: