मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये व्यपाऱयांनीही सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेले आहे. मात्र, या बंद विरोधातव्यापाऱ्याना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे . यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
ते आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. राज्यातील बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या शेतकऱ्यांचं आपण देणं लागतो, त्यामुळेच हा बंद आहे. पण बंदला पाठिंबा नाही, बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका करतानाच बंद मोडून काढण्याचा इशारा देणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
आमचा बंदला पाठिंबा नाही अशी कोणी राजकीय विधान करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे नागरिक आहोत का?, या देशातील शेतकऱ्यांचे देण लागतो का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा. कोणी हा बंद मोडून काढू असं म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. कोणाला वाटत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू तर त्यांनी येऊन दाखवावं. लखीमपूर खेरीत मंत्रीपुत्राने त्याच्या थार गाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला अशी कुणाकडे एखादी जीपगाडी असेल तर त्यांनी रस्त्यावर आणावी, असा इशाराही त्यांनी दिला.