राज्यात शिवसेना पक्षाने भाजपाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते, तर दुसरीकडे भाजपने आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढण्याचे जाहीर करून टाकले आहे, त्याचप्रमाणे काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या स्वबळावर लादण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे.
केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील सत्ताकारणाबाबत आपली मते मांडली. ते नाशिकमध्ये बोलत होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्कर्षासाठी काम केले. मात्र त्यांनी देश घडविण्याचेही काम केले आहे. नदीजोड प्रकल्प त्यांनी देशाला सुचवला. दामोदर व्हॅलीची निर्मिती केली. विविध जाती धर्माच्या, विविध भाषेच्या, गरीब श्रीमंत सर्व वर्गाच्या माणसांना एकत्र जोडणारा समतेचा मार्ग, राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
पुढे आठवले म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की, कोणताही पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे चारही मोठे पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यांचे लोकप्रतिनिधीही निवडून आणू शकत नाही. त्यासाठी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागते, असे सांगत म्हणूनच रिपाइं युतीचे राजकारण करीत असल्याचे रामदास आठवले यांनी नमूद केले.