राज्यात पुन्हा एकदा कोरोनने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत भर घालणारी आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे. आरोग्यमंत्री टोपे आज दिल्ली दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.
या संदर्भात बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात करोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात व यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्याचबरोबर ६० वर्षावरील व ४५ वयोगटा वरील सर्वांना लस देण्यात येत आहे.
तसेच १.७७ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, या सर्वांना पहिला डोस मे पर्यंत तर दुसरा डोस जून पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २.२० कोटी कोव्हीडशिल्ड व कोवाक्सिन लसींचा आवश्यकता आहे. या अनुषंगाने दर आठवड्यात २० लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.