मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा मलिक यांनी केंद्रीय यंत्रांवर निशाणा साधला आहे. केंद्रीय यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. ते अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबतही करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
नवाब मलिक यांनी, ‘दोन महिने झाले, आर्यन खान प्रकरणात आम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर पाळत ठेवली जात आहे. याबाबत एकाचा पाठलाग आमच्या हितचिंतकांनी केला. त्यावेळी ते पळाले. या संशयितांची माहिती ट्विटरवर अनेकांनी दिली आहे. या लोकांचे ट्विटर हँडल पाहिले असता ते भाजपाशी संबंधित असल्याचे दिसत आहे.’
‘अनिल देशमुख यांच्याबरोबर जसा खेळ झाला तसंच सुरू झालं आहे. याबाबत माझ्याकडे महिती आली आहे. याबाबत माहिती पोलिसांना देण्यात येईल,’ असेही ते म्हणाले. ‘जर केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, घाबरवलं जात असेल तर हे सहन करणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट आहेत. याबाबत मी अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे,’ असेही मलिकांनी नमूद केले आहे.