“व्याजासकट किंमत वसूल करू” थेट पवारांचा काँग्रेसला गंभीर इशारा !

 

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी बोलताना काँग्रेसला चांगलाच इशारा दिला आहे. त्यांनी काल जाहीर सभेत काँग्रेसबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. निवडणुकीत तिकीट वाटप करताना आणि सरकार चालविण्यासाठी त्याग करावा लागतो. पण आम्ही वारंवार त्याग करणार नाही आणि व्याजासकट त्याची किंमत वसूल करू, असा इशाराच शरद पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील ‘राष्ट्रवादीचे दुकान बंद करू’ अशी भाषा केली होती. यावर गडचिरोलीमध्ये बोलताना देखील पवारांनी पटोलेंना टोला लगावला होता. त्यांनी म्हटलं होतं की, नाना पटोले बोलू शकतात, आम्ही नाही बोलू शकत. आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे. पवारांचे हे वक्तव्य प्रत्युत्तर मानलं जात आहे.

शरद पवार यावेळी म्हणाले की, कोळशाच्या प्रदूषणाची किंमत चंद्रपूर जिल्ह्याला चुकवावी लागली. धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री-वित्तमंत्री यांच्याशी संपर्क साधणार असल्याचंही ते म्हणाले. अमरावतीमध्ये दंगल झाली, पोलिस त्याची चौकशी करतील पण ज्यांच्याकडे देशाची सूत्र आहेत त्यांनी सामाजिक सुसूत्रतेला सुरुंग लावला, असं ते म्हणाले.

पुढे पवार म्हणाले की, डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढल्या तर त्याची झळ कास्तकार-सामान्य लोकांना सहन करावी लागते. शरद पवारांच्या विदर्भ दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज उद्योजक आणि नागरिक संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.

Team Global News Marathi: