कृषी क्षेत्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महाराष्ट्राला अधिकाधिक निधी द्या

 

काही दिवसातच पावसाळा सुरवात होणार असून शेतकऱ्यांना पिक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे. सदर बाब लक्षात घेऊन बँकांनी मिशनमोड स्वरुपात शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करावे. आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून महाराष्ट्राला अधिकाधिक निधी देण्याची सूचनाही यावेळी केली.

केंद्र शासनाने बँकांना पिक कर्जापोटी द्यावयाचा 2 टक्क्यांचा व्याज परतावा पुर्ववत सुरु ठेवावा असा ठरावही राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. 26 लाख 33 हजार कोटी रुपयांच्या पत आराखड्यास मंजूरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत देण्यात आली. यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी 5 लाख 22 हजार 28 कोटी रुपयांच्या तर इतर क्षेत्रासाठीच्या 21 लाख 10 हजार 932 कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात 45.37 टक्क्यांची वाढ आहे.

प्राधान्य क्षेत्रासाठीच्या निधीमध्ये कृषी क्षेत्रासाठी 1 लाख 26 हजार 58 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये पिक कर्जासाठीच्या 64 हजार कोटी रुपयांसह मुदत कर्जाच्या 62 हजार 58 कोटी रुपयांचा समावेश आहे. इतर प्राधान्य क्षेत्रासाठी 3 लाख 96 हजार 10 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावयाचे असेल तर कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये तसेच कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बँकांनी अल्प भू धारक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा वाढवावा तसेच पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन क्षेत्रांसह महिला बचतगटांना अधिक कर्ज द्यावे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार वाढून विकासाला चालना मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

Team Global News Marathi: