कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीला मोजून काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुद्धा आपल्या प्रभागात सुरु केला आहे. काही दिवसात निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. तर दुसरीकडे इच्छुकांना भीती घालण्यासाठी भानामतीचा प्रकार करून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
असाच प्रकार कळंबा तर्फे ठाणे येथील बापूराम नगर येथे घडला आहे. कळंबा परिसरात नावाची यादी आणि त्याला लिंबू, टाचणी टोचून टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकचं खळबळ उडाली आहे. बापूरामनगर परिसरात मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उंदवारांची यादी सापडली आहे. तसेच इतर मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची नावेत त्यात लिहिली आहे.
नावे लिहून ठेवलेल्या या कागदाला लिंबू, टाचण्या, काळा दोरा, लोखंड बांधून तो ठेवण्यात आला होता. काही कार्यकर्त्यांना ही यादी सापडल्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीला कळविले आहे. यावर आता कोल्हापुरात उलट-सुलट चर्चेला सुरवात झाली आहे. असा प्रकार काही महिन्यांपूर्वी मंत्री सतेज पाटील यांच्या घराजवळ घडला होता. तेव्हा सुद्धा कोल्हापुरात एकच खळबळ उडाली होती.