राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना, वाहनांना टोलमाफी जाहीर केली असून त्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.गणेशभक्तांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये याचीही दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. ही टोलमाफी २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत असेल.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता महेश पाटील तसेच टोल नाकाचालक उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, “पुण्यातून जाणाऱ्या मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (एनएच ४८) तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेश भाविकांच्या वाहनांना ही टोलमाफी देण्याबाबत सरकारने परिपत्रकानुसार निर्देश दिले आहेत. यापूर्वी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी देण्यात आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन टोलमाफीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी.”