शिवसेनेतील बंडखोरीनंतर खरी शिवसेना कोणती? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिंदे गटाकडून वारंवार नवनवे दावे केले जात आहे. पक्षाच्या गटनेतेपदापासून सुरु झालेले दावा थेट पक्षचिन्हापर्यंत येऊन थांबले.सध्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे. अशातच आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दसरा मेळाव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे आणि शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचा झाला पाहिजे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलताना म्हणाले की, “खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय. त्यामुळे दसरा मेळाव्याला खऱ्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे.आठवलेंनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घ्यायला पर्यायही उपलब्ध करुन दिला आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही. मात्र शिवाजी पार्कचा दसरा मेळावा जो आहे तो एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं त्यांना परवानगी द्यावी, अशी आमची महापालिकेला सूचना असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री आज कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत हे वक्तव्य केलं.
सध्या राजकीय वर्तुळात आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं. भाजप नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली याबाबत बोलताना आठवले यांनी व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही, मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत आहे. एकनाथ शिंदेंचा गट हा भाजप सोबत आलेला आहे. मागच्या वेळेला भाजप आणि आरपीआय एकत्र असताना मुंबईत 82 जागा निवडून आणल्या होत्या. यंदा देखील 114 जागा निवडून येण्यात काही अडचण येणार नाही. राज ठाकरेंना घेतलं तर भाजपला नुकसान होऊ शकतं असे विधान त्यांनी केलं आहे.