पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाद होत असल्याचे चित्र दिसून आले आहे अशातच आता खडसे यांच्या टीकेला महाजनांनी प्रतिउत्तर दिले आहे. अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने काय केले आणि काय केले नाही, हे आधी एकनाथ खडसे यांनी पहावे व नंतर माझ्यासह गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करावी. खडसे यांनी ‘तू-तू, मैं-मैं’ करण्यापेक्षा आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्यावा, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर केली.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांचे जळगाव येथे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. गिरीश महाजन व गुलाबराव पाटील हे यापूर्वी ‘तू-तू, मैं-मैं’ करत होते व आता दोन्ही एका सरकारमध्ये मंत्री असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. त्यामुळे या दिनही नेत्यांमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खसडे यांच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी आमच्याकडे पाहण्यापेक्षा आपण काय केले हे अगोदर पाहावे. अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोणतेच प्रश्न मार्गी लावले नाही, त्याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले. उलट खडसे यांनी ‘तू-तू, मैं-मैं’ करू नये असा सल्ला देखील दिला.