राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातआक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस स्थानाकांमध्ये अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारींच्या आधारे दाखल करुन घेण्यात आलेल्या सर्व एफआयआर बेकायदा असून माझी अटकही बेकायदा आहे, असा दावा केतकीने केला आहे. आपल्याला अटक करताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या कायद्याचा भंग करण्यात आला असल्याने आपल्याला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही केतकी चितळेने न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे.
१५ मे पासून म्हणजेच मागील २३ दिवसांहून अधिक काळापासून केतकी अटकेत आहे. याच प्रकरणी तीने आता थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली घेतली आहे. केतकी प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी आज एका अर्जाद्वारे विनंती करण्यात येणार असल्याचे तिचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी सांगितले आहे.
‘ज्या व्यक्तींनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यांच्या नावाच्या पोस्टमधील कवितेमध्ये उल्लेख नाही. ही कथित आक्षेपार्ह कविता पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यतीला दुखावणारी आहे असं गृहित धरलं तरी तक्रार करणाऱ्यांपैकी कोणत्याच व्यक्तीचं नाव पवार नाहीय. या संदर्भात पवार नावाच्या कोणत्याही व्यक्तीने पोलिसांकडे लेखी तक्रार दिलेली नाही. मग पोलीस मला अटक कशी करु शकतात?’, असा प्रश्न याचिकेद्वारे केतकीकडून उपस्थित करण्यात आलेला आहे.