मुंबई | तळीये गावाचीही पाहणी करण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी करणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत या दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार असल्यामुळे हा सरकारी दौरा आहे की पक्षाचा अशी विचारणा आता होऊ लागली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. आता या टीकेला भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यपालांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार, लोकप्रतिनिधींना आपल्या दौऱ्यावेळी बोलावले होते. पूरग्रस्तांसाठीचा हा दौरा होता. जास्तीत जास्त मदत करता आली पाहिजे. केंद्राकडून मदत कशी मिळवता येईल, यासाठी दौऱ्यावर येत राज्यपालांनी चांगली भूमिका घेतली होती. कॉग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सुनिल प्रभु आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.
मात्र, भाजपच्या वतीने केवळ आशिष शेलार उपस्थित राहिले. अन्य पक्षांचे नेते का आले नाहीत, हा त्यांचा विषय आहे. मात्र, त्यावरून राजकारण करायचे. राज्यपालांवर टीका करायची हे ढोंगीपणाचे आहे. पूरासारख्या अत्यंत गंभीर विषयात राजकारण न करता शक्य ती मदत केली पाहिजे. मात्र, अशा पद्धतीने चेष्टा करणे हा पूरग्रस्तांच्या वेदनांवर डागण्या देण्याचा प्रकार सुरू आहे, या शब्दांत केशव उपाध्ये यांनी आघाडी सरकारवर टीका केली होती.