भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव वादात सापडला आहे. केदार जाधव हा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळत आहे. तामीळनाडूविरुद्धच्या सामन्यामध्ये खेळत असताना केदार जाधव अर्धवट सामना सोडून गेला. कौटुंबिक कारणामुळे गुरूवारी केदार जाधव मॅच अर्धवट सोडून निघाला, पण यानंतर तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत दिसला.
रोहित पवार हे एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, त्यांनी एमसीएची बैठक बोलावली होती, या बैठीकीत केदार जाधव सहभागी झाला. याबाबतचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. महाराष्ट्र आणि तामीळनाडू यांच्यात पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला गेला. महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावने यालाही याबाबत माहिती नव्हतं. ‘मॅचची पहिली इनिंग इंटरेस्टिंग वळणावर होती. महाराष्ट्राच्या 446 रनच्या पुढे जाण्यासाठी तामीळनाडूचा विजय शंकर लंचनंतरच्या सत्रातही खेळत होता. आमचे प्रशिक्षक संतोष जेधे यांनी फिल्डिंग करत असलेल्या केदार जाधवला पॅव्हेलियनमध्ये बोलावलं.
आम्हीही अंपायरला काय झालं म्हणून विचारलं. यानंतर अंपायरनी मॅच रेफ्रीसोबत वॉकीटॉकीने संपर्क साधला. केदारच्या कुटुंबामध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढावल्याचं आम्हाला सांगण्यात आलं,’ असं अंकित बावने म्हणाला. या प्रकरणी रोहित पवार, केदार जाधव आणि एमसीएचे सचिव शुभेंद्र भांडारकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नसल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे