कर्नाटकातील हल्ल्यानंतर मनसेनं शंका उपस्थित करत चौकशीची केली मागणी

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक प्रशासनाने ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली.

महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूकही थांबविण्यात आली आहे. तर, राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी ४८ तासांचा अल्टीमेटच दिला आहे. आता, शिवसेनाही याच मुद्द्यावरुन आक्रमक झाली असून मिंधे सरकार प्रत्युत्तर देत नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर, मनसेनंही शंका उपस्थित करत या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे तिथे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठी माणूसही पेटून उठल्याचे दिसून येते, पुण्यात काही कन्नड बसेसना काळं फासण्यात आलं होतं. दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेनेनं मुखपत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केलाय. मनसेनंही यावर भूमिका घेत सरकारने या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केलीय

Team Global News Marathi: