‘काही तरी गडबड आहेच, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य’

 

काही तरी गडबड आहेच. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य दिसत आहे. या सरकारचे राज्याकडे अजिबात लक्ष नाही. महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक प्रकल्प गुजरात या एकाच राज्याकडे जात आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांनी दहीहंड्याच फोडायच्या, हनुमान चालिसाच वाचायची, असेच म्हणावे लागेल, असे परखड मत मंगळवारी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. पिके, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे झाले नाहीत. पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी पैसे मागत आहेत. संबंधित मंत्र्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. शेवटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे महत्त्वाचे आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाहीत, याकडे लक्ष वेधले असता थोरात म्हणाले, याचे कारण त्यांनाच विचारले पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत. जनतेच्या भावना राज्यपालांना भेटून आम्ही कळवल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.

Team Global News Marathi: