मुंबई | खेळाच्या मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून सुरु आलेला वाद काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन मालाडमध्ये भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आंदोलन केले होते. या सगळ्या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
हा हिंदू मुस्लीम वाद पेटवण्यासाठीचा मुद्दा असल्याचं सांगत डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘टिपू सुलतान हा फार महत्वाचा मुद्दा आहे अस मी मानत नाही. आर.एस.एस आणि भाजपाला अँटी मुस्लीम लाट निर्माण करणं हे जिंकण्याचं साधन आहे असं ते मानतात. हळू हळू आपला जनाधार कमी होतोय का या भीतीपोटी त्यांनी आता अँटी मुस्लीम भूमिका घ्यायची सुरूवात केली आहे.
तसेच मुंबईतही त्यांनी टीपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद उपस्थित केला आहे. दंगल होईल अशी परिस्थिती आहे. जोवर हिंदू मुस्लीम वाद पेटत नाही, तोवर शासन आपल्या हातात येईल असे त्यांना वाटत नाही. म्हणून उद्याच्या कालावधीत ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं’, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.