राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय’ने गुन्हा नोंद करून त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सीबीआय देशमुखांच्या घरी कागदपत्रे घेऊन गेली असा आरोप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी लगावला होता. त्यांच्या या लावलेल्या आरोपांना भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं घरात कोण जातं आणि कोण येतं हे वॉचमनशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घरचे वॉचमन असावेत, असा टोला राणे यांनी लगावला.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, जयंत पाटलांनी डोकं लावून बोलावं. तुम्हाला हे शोभत नाही, असं सांगतानाच परमबीर सिंग यांना त्यावेळी मांडीवर घेऊन बसला होता. आता ते व्हिलन झाले आहेत काय? असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राणे-राष्ट्रवादी वाद आणखी पेटताना दिसून येणार आहे यावर आता राष्ट्रवादी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.