राज्य सरकारने फक्त रायगडाचेच शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड-किल्ले जिंकले आहेत. त्यांची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यापैकी 30 गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम आपण हाती घेतले आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या शहागडाचा समावेश करण्यात येणार असून, जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर सरकारच्या अंगावर जाणार असल्याची गर्जना छत्रपती संभाजीराजे यांनी केली. राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे तालुक्यातील पेमगिरी येथे संभाजी राजे मेळाव्यानिमित्त आले होते. या वेळी अध्यक्षस्थानी संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख होते.
पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यात जिंकलेले स्मारके किंवा गड-किल्ले खऱ्या अर्थाने जिवंत ठेवायचे असेल, तर त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणेच राज्य सरकारने रायगडाचे संवर्धन शास्त्रशोक्त पद्धतीने केले, त्याचप्रमाणे इतर गड-किल्ल्यांचे संवर्धन का होत नाही, असा सवाल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. जर तुम्हाला दुरवस्था झालेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही अडचण येत असेल, तर तेही सांगा. आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची गरज नाही.
आम्ही गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी फेडरेशन संस्था स्थापन केली असून, राज्यातील 30 गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. आम्हाला केंद्र सरकारची कुठल्याही प्रकारची अडचण नाही; परंतु हे सर्व गड-किल्ले राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाच्या ताब्यात आहेत. तरी गड-किल्ले संवर्धनासाठी परवानगी द्यावी. आम्ही वर्षभरात सर्व गड-किल्ले संवर्धन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला