मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २७ जून रोजी होणारी नागरी सेवा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी याबाबत रीतसर परिकत्रक सुद्धा काढण्यात आले आहे. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे यूपीएससीकडून सांगण्यात आले आहे. यावरुन काँग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलं आहे.
राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…
केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत??
आता दातखिळी बसली आहे का??#महाराष्ट्रद्रोही
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) May 17, 2021
भाई जगताप आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, एमपीएससी परीक्षा रद्द झाल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे आहेत? असा सवाल भाईंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारला आहे. देशात कोरोना संसर्गाचे विदारक रुप पाहायला मिळत आहे, गेल्या दोन दिवसांत कोरोना संसर्ग रूग्णाची वाढीव आकडा कमी होत असला तरी अद्यापही कोरोनाचे संकट आहेच. त्यामुळे, बहुतांश राज्य सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.
त्यामुळे, सर्वसामान्यांचे हाल होत असून केवळ अत्यावश्य सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. सरकार दरबारीही १५ टक्केच कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच, शाळांच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत. आता, केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससीची परीक्षाही रद्द केली आहे. त्यावरुन, काँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केलं आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत, असा सवाल भाईंनी विचारला आहे. तसेच, आता दातखिळी बसली आहे का? असे म्हणत गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता महाराष्ट्रद्रोही असेही म्हटलं आहे.