पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती, मंत्री उदय सामंत यांची माहिती !

नागपूर | करोना संसर्गामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी राज्यातील तेराही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन करून राज्यस्तरावर एकच ‘सामायिक परीक्षा’ अर्थात सीईटी घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. नागपूर येथे शिवण प्रणित युवासेना कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. बारावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही मार्ग सुचवलेला नाही. शिवाय पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

करोनामुळे प्रथमच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापूर्वी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. आता केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणेच राज्यातही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली, राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रीसर्च असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून खासगी विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पेरा सीईटी २०२१ यंदा १६ ते १८ जुलै दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी १० जुलै ही अंतिम मुदत असून, २३ जुलैला निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती सामंत यांनी दिलेली आहे.

Team Global News Marathi: