एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरातील जनता त्रस्त झालेली असताना दुसरीकडे वाढत्या महागाई विरोधात सर्व सामान्य नागरिकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. आज वाढत्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून सामान्य नागरिक हतबल झाला आहे. तर वाढत्या गॅस दरवाढीमुळे गृहिणीचे घराचे बजेट बिघडले आहे. याच विरोधात आता वाराणसीवायसीयांनी थेट मोदी सरकारला सवाल विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशवासीयांना केवळ भ्रमित करण्याचे काम केले आहे. रस्ते, पाणी तसेच इतर कोणत्याही पायाभूत विकासाला चालना तर दिली नाहीच उलट भाजपमुळे ४०० रुपयांना मिळणारा सिलिंडर आज एक हजार रुपयांना मिळतोय. एवढी महागाई वाढवून ठेवली आहे की आता आम्ही खायचे काय, असा थेट सवाल वाराणसीवासीय भाजपला विचारू लागले आहेत.
उत्तर प्रदेशमधील २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची महाचिंतन बैठक सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी चाय पे चर्चा करत केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप आणि नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आता मोदी आणि भाजपविरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे. चहा दुकानांवरही तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.
आज देशाची १३५ कोटी लोकसंख्या आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येत तरुणांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाला चांगल्या सोयीसुविधा हव्या आहेत. सर्वांना चांगली आरोग्य सुविधा आणि शिक्षण हवे आहेत. सरकार प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे जादूची छडी नाही, असेही मत एकाने व्यक्त केले. लोकांच्या मताने नाही तर राज्यघटनेनुसार देश आणि राज्य पातळीवरील कामकाज चालले पाहिजे, अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली.