मुंबई | जगभरात तसेच भारतातही कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस द्यावा की नाही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस कोविड लसीच्या बूस्टर डोसबाबत धोरण जाहीर केलं जाऊ शकतं. काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली आहे. अशात प्रश्न असा उपस्थित होतो की बूस्टर डोसची खरोखर गरज आहे का? प्रत्येकाकडे तो देणं आवश्यक आहे का? सरकारचा अजेंडा काय आहे? इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR च्या शास्त्रज्ञांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
देशातील अनेक तज्ज्ञांनी बूस्टर डोस देण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला विशेषतः ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब सारखा आजार आहे त्यांच्यासाठी दिला जात आहे. तसंच दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यसेवा कर्मचार्यांनाही बुस्टर डोसची आवश्यकता असल्याचं म्हटलं गेलं आहे. पण सध्या. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार केंद्राचं लक्ष प्रत्येकाला लसीचा किमान एक डोस देण्यावर आहे. हे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यासाठी ‘हर घर दस्तक’हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकाचं लसीकरण करून घेणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या संदर्भात पांडा म्हणाले, ‘आरोग्य मंत्रालय कोणताही निर्णय हा शास्त्रीय आधारावर घेतं. यामध्ये NTAGI मंत्रालयाला मार्गदर्शन करतं. कोणतेही धोरण बनवण्यापूर्वी संबंधित विभाग आणि मंत्रालयांचं मत घेतले जाते. ते पूर्णपणे वैज्ञानिक आधारावर आहे. आणि सध्या देशातील वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर सांगायचं झाल्यास बूस्टर डोसची गरज नाही.