नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज विविध जगभरातील वृत्तपत्रांनी भारतातील हृदद्रावक कोरोना परिस्थितीचे चित्र मांडले आहे. आज मागच्या 10 दिवसांपासून तीन लाखांपेक्षा जास्त आढळणारी रुग्णसंख्या आज चार लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
देशातील ही परिस्थिती पाहात देशात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. अमेरिका येथील जो बायडन यांच्या प्रशासनातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊजी यांनी मोदी सरकार यांना भारतात लवकरत लवकर लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील कोरोनास्थिी भयानक आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तमानपत्राला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारला तीन महत्वाचे सल्ले दिले आहेत.
भारतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही आठवड्याचा लॉकडाउन लावण्याची गरज आहे. लॉकडाऊन लावल्यानंतर मोदी सरकार आणि प्रशासनानं तीन पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडून टास्क फोर्ससारखी एखादी टीम तयार करावी लागेल. या टास्कफोर्सनं तीन पातळ्यांवर विचार करण्याची गरज आहे. त्यामध्ये पहिली महत्वाची बाब, सध्याची परिस्थिती कशी हाताळावी लागेल.
तसेच कोरोनाला रोखण्यासाठी देशातील सध्याची परिस्थिती हाताळत असतानाच लसीकरणही वाढवावं लागेल. कारण, लसीकरण वाढवल्यानंतर कोरोनाची दुसरी लाटही आटोक्यात येण्याची शक्यता जास्त आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे, सध्याच्या परिस्थितीला युद्धजन्य परिस्थितीच मानली गेली पाहिजे. त्यामुळे फिल्ड हॉस्पिटलची निर्मीती करावी लागेल.