राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीच्या अनेक नेत्यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यातच दोनच दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांना सुद्धा पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुरिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे शनिवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जो भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते. ही भारतामध्ये आता फॅशन झाली आहे. ज्याप्रकारे पोस्टातून पत्र येतात, त्याचप्रकारे आता ईडीतून नोटिसा यायाला लागण्या आहेत. हे सर्व दुर्दैवी आहे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपतील नेते महाविकास आघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरून सातत्याने टीका करत असतात. विरोधकांकडून सतत होणाऱ्या टीकेबद्दलही सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केलं. ‘आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावं. आमची महाविकास आघाडी मात्र जनतेची सेवा करत राहिल’, असा टोला सुप्रिया सुळेंनी भाजप नेत्यांना लगावला आहे.