मुंबई | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाला अटक करण्यात आलेली असताना दुसरीकडे याच मुद्द्यावरून कारवाई करणाऱ्या एनसीबीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप लगावले होते. तसेच एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका केली होती.
आता या टिकेला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, ”एनसीबीने फक्त हेरॉईन नव्हे तर नेत्यांच्या – अभिनेत्यांच्या बिघडलेल्या हिरोंना पण पकडलंय. त्यांची पाठराखण करण्याच्या नादात महाविकास आघाडी सरकार व्हिलन बनले आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.”
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
”सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे.’ तसेच, केंद्रातील तपास युनिटच या प्रकरणांचा तपास लावू शकतात, असे नाही. तर, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले होते पण त्यात ‘हिरोईन’चा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता.”