मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर घणाघाती टीका केली. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली, यांना राजकारणाचा गजकर्ण झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या भाषणात सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले, पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते.
तसेच शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय त्यांनी केला होता, त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात. भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का?’ असा खोचक सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, हे भाजपासोबत सडले असं सांगातत. पण भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे. त्यांना आठवण करुन देतो की तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता असा टोला सुद्धा लगावला होता.