शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शोक व्यक्त केला होता.
राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील. गणपराव यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं ते मला जास्त महत्वाचं वाटतं, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
तसेच शरद पवारांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली आहे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे गणपतराव देशमुख यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल, असं शरद पवार म्हणाले.