मुंबई | सध्या मुंबई विविध प्रकरण गाजत असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला धारेवर धरले आहे. गुरुवारी भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्र लिहल्यानंतर आज भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात मुंबईत मराठी भाषेवरून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीकाही केली आहे.
मुंबईत शिवसेनेने ३० वर्षे सत्ता गाजवल्यावरही या ठिकाणी मराठी भाषेची अवस्था खूप बिकट असल्याचे साटम यांनी म्हंटले आहे. शिवसेनेकडून मराठी भाषेसाठी प्रयत्न होत नसल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साटम यांनी पत्र पाठवले असून त्यामध्ये त्यांनी मराठी भाषा व मराठी शाळांच्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात साटम म्हणतात की, ‘शिवसेनेने मुंबईत जवळपास ३० वर्षे सत्ता गाजवली, पण मुंबईत मराठीची अवस्था बिकट झाली आहे. मराठी माणूस बाहेर फेकला, तशीच अवस्था मराठी शाळांची आणि भाषेची झाली आहे. सण 2010-11 मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आणि विद्यार्थी संख्या १ लाख २ हजार २१४ होती. आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त ३६ हजार ११४ इतकी राहिल्याचे साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून म्हटले आहे.